- हा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारचा, मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार
पुणे |लोकशक्ती|
लोकसभा आणि विधासनभा निवडणुका संपुर्ण देशात एकाचवेळी घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असून तो केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. परिणामी याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पुणे दौऱ्यावर आहेत. याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत राजीवकुमार यांनी ‘एक देश एक निवडणूक’ यावर भाष्य केले. सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुका या एकत्रित घेणे निवडणूक आयोगाच्या दृष्टीने शक्य आहे. त्याबाबत साधनसामुग्रीसह आमची सज्जता आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय आहे. हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही. त्यावर केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. तरुणांपासून तृतीयपंथांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मतदार यादी, मतदान प्रक्रिया या दोन्ही पारदर्शक आणि सर्वसमावेश करण्याचा मानस आहे. मतदानाच्या दिवशी औद्योगिक कंपन्यांना सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, मतदार त्या सुट्टीचा आनंद घेत मतदानाकडे पाठ फिरवितात. त्यामुळे उद्योजक, विद्यापीठे, विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांशी आम्ही संवाद साधत असून त्यांच्यात मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करीत असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ. रणबीर सिंह, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण या वेळी उपस्थित होत्या.