पुणे |लोकशक्ती|
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या तब्बल ११६ खासदारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी ८७ खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी माध्यमांसमोर मांडली. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत या विषयावर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांच्यासह पुणे शहर उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे देखील उपस्थित होत्या. ज्या महिलांवर अन्याय झाला आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधावा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
“मोदी सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात देशात महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यात महिला अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये भाजप खासदार, आमदार व नेत्यांची यादी मोठी आहे. तसेच हे केवळ हिमनगाचे टोक आहे. भाजप सत्तेत आहे या धाकाने अनेक महिला गप्प असतील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेसाठी मोदी सरकारने ४०१ कोटींची जाहीरातबाजी केली होती. त्याप्रमाणेच मोदी सरकार त्यांच्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या अत्याचारांची माहितीही जाहीरातीद्वारे प्रसिद्ध करणार का”, असा सवाल देखील विद्या चव्हाण यांनी मोदी सरकारला विचारला आहे.