पटना – शिवसेनेतील बंडामुळं महाराष्ट्रातील सत्ता ताब्यात घेण्यात यशस्वी झालेल्या भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री भाजपवर प्रचंड नाराज असून ते भाजपची साथ सोडण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या माध्यमातून पर्यायाची चाचपणी सुरू केली असून राष्ट्रीय जनता दलही सक्रिय झाला आहे. त्यामुळं भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे.
कधी काळी भाजपसोबत असलेला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं काही वर्षांपूर्वी राज्यातील कट्टर प्रतिस्पर्धी लालू प्रसाद यादव यांच्याशी जुळवून घेऊन निवडणूक लढली होती. यात दोन्ही पक्षांच्या महाआघाडीचा विजय झाला होता. मात्र, कालांतरानं मतभेद झाल्यामुळं नितीश कुमार यांनी भाजपशी पुन्हा घरोबा केला. भाजपशी घरोबा करून पुन्हा निवडणूक लढलेल्या नितीश कुमार यांना निवडणुकीत झटका बसला. भाजपला जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यानंतरही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून ते नाराज आहेत. त्यातूनच ते वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.