नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदार राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचले. यानंतर माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले. तसेच, देशात शांतता नांदावी, अशी गांधीजींना प्रार्थना केल्याचेही ते म्हाले.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत दारू घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे, पण भाजपला या घोटाळ्याची काहीही माहिती नाही. ते सर्व चुकीची माहिती पसरवत आहेत. हा घोटाळा म्हणजे ऑपरेशन स्कॅम असल्याचे केजरीवाल यावेळी म्हणाले. तसेच, भाजपने दिल्लीत 800 कोटी रुपये ठेवल्याचा आरोप केजरीवालांनी केला. त्यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरला खोटा एफआयआर म्हटले.
आपच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर?
अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापेमारीदरम्यान काहीही सापडले नाही. आम आदमी पक्षाच्या आमदाराला पक्ष तोडण्यासाठी आणि भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. 40 आमदारांना ऑफर मिळाली, पण एकही ‘आप’ आमदार फुटला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.